मराठी माणूस.. तोही मध्यमवर्गीय.. एकटा-दुकटा.. विमा कंपनी, बँक वगैरे काढण्याच्या फंदात स्वप्नातसुद्धा पडणार नाही. पण अण्णासाहेब चिरमुले पडले. तेही १९१३ साली. म्हणजे बरोबर १०० वर्षांपूर्वी या मध्यमवर्गीय माणसाला विमा कंपनी काढावीशी वाटली. मराठी मध्यमवर्गीय असूनही हा माणूस इतका दूरदृष्टीचा होता, की त्यानंतर ३३ वर्षांनी त्यांनी बँक काढली. युनायटेड वेस्टर्न बँक! १९३६ साली! म्हणजे ऑल इंडिया रेडियोचा जन्म झाला, त्या वर्षी. आणि तेसुद्धा कुठे? तर- मुंबईत नाही. थेट साताऱ्यात. ज्या सातारा जिल्हय़ानं यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, पहिले ऑलिम्पिक पदकविजेते पैलवान खाशाबा जाधव, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी गोपाळराव देशमुख, माडगूळकर, चिंतामणराव कोल्हटकर, मर्ढेकर आदी अनेक एकाहून एक तेजस्वी नररत्ने दिली, त्याच साताऱ्यात देशातली पहिली खासगी बँक जन्माला आली.

Post a Comment